Friday, 26 December 2025

सवय (Habit)

  सवय जीवन घडवणारा अदृश्य घटक

मानवाचे आयुष्य आकार घेते ते त्याच्या विचारांमधून आणि कृतीमधून; आणि या दोन्हींच्या मागे असतो तो एक अदृश्य, पण अत्यंत प्रभावी घटक म्हणजे सवय. सवय हा मनुष्याच्या दिनचर्येचा पाया आहे. एखादी कृती वारंवार केल्याने ती कृती नकळत आपल्या स्वभावाचा भाग बनते आणि त्यातून निर्माण होणारा परिणाम आपले संपूर्ण जीवन बदलू शकतो.
सवय म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करून तिचे स्वयंचलित होणे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक, जाणूनबुजून केलेली क्रिया कालांतराने सहज, आपोआप होऊ लागली की ती चांगली किंवा वाईट सवय म्हणून आपले ठरते. सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. बोलण्याची शैली, उठण्याची वेळ, काम करण्याची पद्धत, इतरांसोबत वागणूक, रोजचा आहार, अभ्यासाची इच्छा या सर्व व्यवहारामागे आपल्यातील सवयींचेच प्रतिबिंब दिसते.
चांगल्या सवयींचे फायदे अमूल्य आहेत. नियमित व्यायाम करणे, वेळेचे भान ठेवणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे, नेहमी सत्य बोलणे, धैर्याने काम करणे अशा सवयी मनुष्याला यशाच्या दिशेने घेऊन जातात. चांगल्या सवयी केवळ व्यक्ती सुधारत नाहीत तर त्याची नाती, आरोग्य, विचारसरणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक बनवतात. छोटीशी चांगली सवयही मोठा बदल घडवू शकते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दररोज फक्त दहा मिनिटं वाचनाची सवय लावली, तर काही महिन्यांत तिचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही समृद्ध होतात. सवयी दिसायला लहान जरी वाटत असल्या तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे असतात.  
जशा चांगल्या सवयी जीवन घडवतात, तशाच वाईट सवयी जीवन बिघडवू शकतात. जंक फूड खाणे, वेळेचा अपव्यय करणे, टाळाटाळ करणे, अनावश्यक रागावणे, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे अशा वाईट सवयी हळूहळू मनुष्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या सवयी सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात, पण दीर्घकाळात त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.
सवय बदलणे अवघड वाटते, परंतु अशक्य नसते. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करण्याची गरज असते. चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी ठराविक वेळ, योग्य वातावरण आणि नियमित सराव आवश्यक आहे. सवयी बदलण्याची प्रक्रिया ही हळूहळू होत असली तरी तिचा परिणाम दीर्घकालीन आणि सकारात्मक असतो.
शेवटी, सवय ही आपल्या जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे. आपल्या प्रत्येक दिवसातल्या लहान सवयीच आपल्या उद्याचे भविष्य ठरवतात. म्हणूनच चांगल्या सवयी जोपासणे आणि वाईट सवयी दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य सवयी अंगीकारल्या तर यश, आनंद आणि समाधान हे नक्कीच आपल्या वाट्याला येते.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 21 December 2025

गणित आणि जीवन ( Maths & Life )

      गणित आणि आपले जीवन 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक विषय अभ्यासाला असतात. जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित. गणित हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो केवळ गुण मिळवण्यासाठीचा विषय नसून विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारे शास्त्र आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात गणिताचे स्थान अनन्यसाधारण आहे.
गणितामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, अचूकता आणि संयम शिकायला मिळतो. उदाहरणार्थ, एखादी गणिती समस्या सोडवताना प्रत्येक पायरी काळजीपूर्वक आणि योग्य क्रमाने करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढते. तसेच गणितामुळे निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासही वाढतो. तसेच गणिताचा अभ्यास किंवा सराव बुद्धीला ताजेतवाने करून टाकते. इतर विषयाचा अभ्यास करून कंटाळा आला असेल तर एखादे गणित सोडवले की, मन प्रसन्न होते. 
दैनंदिन जीवनात गणिताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. गणिताशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. जीवनात पावलोपावली गणिताचे काम पडते. वेळेचे नियोजन, पैशांचा व्यवहार, मोजमाप करणे, खरेदी-विक्री, तंत्रज्ञान, संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांमध्ये गणित आवश्यक आहे. त्यामुळे गणित शिकणे म्हणजे जीवनासाठी तयार होणे असेच म्हणावे लागेल.
मात्र अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण वाटते. गणित म्हटलं की नाक मुरडतात, पोटात कळ येते. कारण लहानपणापासून गणिताची भीती मनात बसलेली असते. परंतु प्राथमिक वर्गात योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि समजून शिकण्याची पद्धत वापरल्यास गणित सोपे आणि रंजक होऊ शकते. शिक्षकांनी उदाहरणे, खेळ, कोडी व कृतींच्या माध्यमातून गणित शिकवले तर विद्यार्थ्यांच्यामनातून गणिताची भीती निघून जाते आणि गणितातला रस नक्कीच वाढतो. गणित आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट आहे. गणितामुळे विद्यार्थी सक्षम, आत्मविश्वासू आणि विचारशील नागरिक बनतो. जीवन जगण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. जीवनात येत असलेल्या अनेक संकटाना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी गणिताकडे भीतीने नव्हे तर मैत्रीच्या नजरेने पाहिले पाहिजे. आज प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस जो की संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी असा संकल्प करू या की गणित समजून घेऊ या आणि आनंदात जीवन जगू या. 

खाली श्रीनिवास रामानुजन यांचा एक जादुई चौकट आहे. त्याचा अभ्यास करा आणि आपलं ही एक चौकट तयार करा. 
नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

आनंदाचे डोही........! ( Be Happy )

     आनंदाचे डोही आनंद तरंग 

भारतीय संतपरंपरेत आनंदाला फार उच्च स्थान दिले आहे. संतांच्या मते खरा आनंद हा बाह्य सुखसाधनांत नसून आत्मिक आणि आध्यात्मिक अनुभवात आहे. पैसा, सत्ता, भोग किंवा ऐहिक सुखे ही क्षणिक असून ती माणसाला कायमचा आनंद देऊ शकत नाहीत. खरा, शाश्वत आनंद हा आत्मज्ञानातून आणि ईश्वरभक्तीतून मिळतो, असे संत सांगतात. संत ज्ञानेश्वरांच्या मते, आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर जो आनंद अनुभवाला येतो, तोच खरा आनंद आहे. त्यांनी “आनंदाचे डोही आनंद तरंग” असे सांगून ब्रह्मानंदाचे वर्णन केले आहे. आत्मानंदात विलीन झाल्यावर दुःख, भय आणि अहंकार नाहीसे होतात, आणि मन पूर्णतः तृप्त होते.
मानवाच्या जीवनातील सर्वांत मोठे ध्येय म्हणजे आनंदी राहणे. पैसा, यश, प्रतिष्ठा, संपत्ती या साऱ्या गोष्टी माणसाला हव्या असतात, पण त्यामागचा खरा उद्देश आनंद मिळवणे हाच असतो. तरीही आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद विसरत चालला आहे. सततची स्पर्धा, ताणतणाव, अपेक्षा आणि असमाधान यामुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी “आनंदी राहा” हा केवळ सल्ला नसून तो एक जीवनमंत्र ठरतो.
आनंद ही बाहेरून मिळणारी गोष्ट नसून तो आपल्या मनातून निर्माण होतो. अनेकदा आपण आनंदाला परिस्थितीशी जोडतो, चांगली नोकरी मिळाली तर आनंद, जास्त पैसा मिळाला तर आनंद, परीक्षा उत्तीर्ण झालो तर आनंद. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात. खरा आणि टिकणारा आनंद मन:शांतीतून येतो. जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो, जे आहे त्यात समाधान मानतो, तेव्हा खरा आनंद अनुभवता येतो.
संत तुकारामांच्या अभंगांतूनही आनंदाचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांच्या मते ईश्वरनामस्मरण आणि भक्तीमुळे मन निर्मळ होते आणि त्या निर्मळ मनातच आनंद वास करतो. “नाम घेतां हरिचे, हर्ष झाला चित्ती” असे म्हणत त्यांनी नामस्मरणातून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे. संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हरिभक्ती, असे ते सांगतात.
आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. नकारात्मक विचार मनात घर करून बसले तर आनंद दूर जातो. प्रत्येक समस्येकडे संधी म्हणून पाहण्याची दृष्टी असली, तर कठीण प्रसंगातही आनंद सापडतो. जीवनात चढ-उतार येतच असतात; त्यांना धैर्याने आणि आशावादी दृष्टीने सामोरे जाणे हेच आनंदी जीवनाचे गमक आहे.
संत एकनाथांनी समाधान आणि संयम यांना आनंदाचे मूळ मानले आहे. त्यांनी सांगितले की, इच्छांचा अतिरेक माणसाला दुःखी करतो, तर समाधान आणि विवेक जीवनात आनंद निर्माण करतात. मनावर संयम ठेवला तर बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली, तरी अंतःकरणात आनंद टिकून राहतो.
आनंदाचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे नातेसंबंध. कुटुंब, मित्र, आप्तेष्ट यांच्यासोबत घालवलेला वेळ मनाला समाधान देतो. प्रेम, आपुलकी, सहकार्य आणि क्षमाशीलता यामुळे नाती घट्ट होतात आणि मन आनंदी राहते. एकमेकांशी तुलना करण्याऐवजी एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे हे खऱ्या आनंदाचे लक्षण आहे.
संत कबीरांनीही खऱ्या आनंदाविषयी स्पष्ट मत मांडले आहे. त्यांच्या मते, बाह्य आडंबर, कर्मकांड आणि दिखावा यात आनंद नसून, अंतर्मुख होऊन सत्याचा शोध घेतल्यासच आनंद मिळतो. आत्मज्ञान आणि अहंकाराचा त्याग हाच आनंदाचा खरा मार्ग आहे, असे ते सांगतात.
सेवा आणि मदत केल्यानेही आनंद मिळतो. गरजू व्यक्तीला मदत करणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, समाजासाठी काहीतरी चांगले करणे, या गोष्टींमुळे मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो. स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व दिले तर जीवन अधिक अर्थपूर्ण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही आनंदासाठी आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग, ध्यान, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते, आणि निरोगी मनातूनच खरा आनंद उमलतो.
एकूणच संतांच्या मते आनंद हा भौतिक सुखात नसून आत्मिक शांतीत, भक्तीत, समाधानात आणि परोपकारात आहे. मन निर्मळ ठेवून, ईश्वराशी नाते जोडून आणि अहंकाराचा त्याग करणे होय. शेवटी असे म्हणता येईल की आनंद शोधण्याची गोष्ट नसून जोपासण्याची गोष्ट आहे. लहानसहान गोष्टींत आनंद शोधणे, कृतज्ञ राहणे, सकारात्मक विचार करणे आणि प्रेमाने जगणे, हेच आनंदी राहण्याचे खरे सूत्र आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी “आनंदी राहा” हा मंत्र जपला, तर जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण नक्कीच बनेल.

नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

Thursday, 18 December 2025

चला, मतदान करू या..! ( Vote For Nation )

         चला, मतदान करू या

भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही ही शासनपद्धती जनतेच्या इच्छेवर आधारलेली असते. लोकशाहीत जनतेला आपल्या प्रतिनिधींची निवड करण्याचा अधिकार असतो आणि हा अधिकार वापरण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मतदान. “चला, मतदान करू या” हा केवळ घोषवाक्य नसून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन आहे. मतदानामुळे प्रत्येक नागरिकाला देशाच्या कारभारात सहभागी होता येते.
“राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असणे अत्यंत आवश्यक आहे.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. यातून हे स्पष्ट केले की मतदान हा केवळ अधिकार नसून समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्याचे साधन आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मताधिकार देण्यासाठी कठोर संघर्ष केला. त्यांच्यामते, मतदानाद्वारेच दुर्बल आणि वंचित घटक आपला आवाज सत्तेपर्यंत पोहोचवू शकतात.
मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तसाच तो एक महत्त्वाचा कर्तव्यही आहे. आपल्या घटनेने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून आपण देशाच्या विकासासाठी योग्य, प्रामाणिक आणि सक्षम प्रतिनिधी निवडू शकतो. जर आपण मतदान केले नाही, तर चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मतदान न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे चुकीला प्रोत्साहन देणे होय.
“खरा लोकशाहीचा अर्थ असा की जनतेची सेवा करणारे प्रतिनिधी निवडले जातील.” असे महात्मा गांधींजी यांनी म्हटले आहे. मतदान करताना प्रामाणिक, सेवाभावी आणि नैतिक उमेदवाराची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे केवळ अधिकार न राहता नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांचे मत होते.
आज अनेक लोक “माझ्या एका मताने काय फरक पडणार ?” असे म्हणून मतदान टाळतात. परंतु हे विचार चुकीचे आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताला समान मूल्य असते. अनेक वेळा निवडणुकांचे निकाल अत्यंत कमी मतांच्या फरकाने लागतात. अशा वेळी एका मताचेही महत्त्व प्रचंड असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मताची ताकद ओळखली पाहिजे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू म्हणतात की,  “लोकशाही ही केवळ शासनपद्धती नसून ती जीवनपद्धती आहे.” पंडीत नेहरूंनी मतदानाला लोकशाही जीवनाचा अविभाज्य भाग मानले. त्यांच्या मते, नागरिकांनी जागरूक राहून मतदान केल्यासच लोकशाही मजबूत होते.
मतदानामुळे समाजात जागरूकता निर्माण होते. निवडणुकांच्या काळात विविध प्रश्नांवर चर्चा होते, जसे की, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरण संरक्षण इत्यादी. मतदार जेव्हा जागरूक होतो, तेव्हा तो केवळ उमेदवार नव्हे तर धोरणे, विचारधारा आणि कामगिरी पाहून मतदान करतो. अशा सुजाण मतदानातूनच चांगले नेतृत्व पुढे येते. 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते, देश घडवण्यासाठी नागरिकांनी निष्क्रिय न राहता मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. तरुण पिढीची भूमिका मतदानात अत्यंत महत्त्वाची आहे. तरुणांमध्ये ऊर्जा, नवे विचार आणि बदल घडवण्याची क्षमता असते. जर तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले, तर देशाच्या राजकारणात सकारात्मक बदल घडू शकतात. सोशल मीडियावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे अधिक परिणामकारक ठरते.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयता राखली जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदान सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. त्यामुळे मतदान करणे आता अधिक सुलभ झाले असून कोणतेही कारण देऊन मतदान टाळणे योग्य नाही. सरकारी कर्मचारी आणि कामगार मंडळीना मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जाते. त्या सुट्टीचा सदुपयोग करावे. सुट्टी मिळाली म्हणून मतदान न करता कुठे ही अन्य ठिकाणी फिरण्यास जाऊ नये. आपले कर्तव्य पूर्ण करावे. 
शेवटी असे म्हणता येईल की, मतदान हे लोकशाहीचे प्राण आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. चला तर मग, उदासीनता बाजूला ठेवूया, जागरूक नागरिक बनूया आणि अभिमानाने म्हणूया, चला, मतदान करू या !

नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769

Wednesday, 12 November 2025

जादूची पिशवी ( Jaduchi Pishavi )

जीवनातील सूक्ष्म अनुभव सांगणारा कथासंग्रह जादूची पिशवी –लेखक नासा येवतीकर .


नासा येवतीकर यांचे ‘जादुची पिशवी’  कथासंग्रह मराठी लघुकथालेखनातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी साहित्यिक योगदान आहे. हा संग्रह वाचकाला साध्या जीवनातील सूक्ष्म अनुभव, मानवी नात्यांमधील विविध भाव, आणि समाजातील विविधतेचे दर्शन करून देतो. लेखकाने प्रत्येक कथेत जिवंत प्रसंग, पात्रांचे अंतरंग, आणि भावनांचे सूक्ष्म थर इतके प्रगल्भपणे मांडले आहेत की वाचक त्या कथेत स्वतःला सामील होण्यास भाग पडतो. शीर्षक ‘जादुची पिशवी’ हे प्रतीकात्मक आहे; जिथे रोजच्या जीवनातील साधे क्षण, अनुभव, आनंद‑दुःख, आणि भावनांची जादू एकत्र साठवली आहे. हा संग्रह केवळ कथासंग्रह नाही, तर वाचकाला मानवी जीवनाच्या सूक्ष्म, अदृश्य पण प्रभावी अनुभवांची जाणीव करून देणारा प्रवास आहे.
संग्रहातील प्रत्येक कथा रोजच्या जीवनातील घटनांवर आधारित आहे, पण त्या घटनांमधून मानवी मनाची गहनता प्रकट होते. वाचक प्रत्येक प्रसंगात पात्रांच्या मनात प्रवेश करतो आणि त्यांचा अनुभव थेट अनुभवतो. उदाहरणार्थ, ‘कळी उमलण्याआधी…!’ ही कथा मुलीच्या लग्नापूर्वीच्या मानसिक अवस्थेवर केंद्रित आहे. आई‑वडिलांची चिंता, समाजाची अपेक्षा, आणि मुलीचा आत्मसंवाद ही कथा सूक्ष्मपणे उलगडते. कथानक साधे आहे, परंतु लेखकाने त्याला भावनिक गहिरेपणा आणि जिवंतपणा दिला आहे. वाचक त्या पात्राच्या अंतरंगात सामील होतो, प्रत्येक क्षण त्यांच्या अनुभवांशी जोडतो.
‘लॉकडाऊन’ या कथेत कोरोना काळातील परिस्थितीचे वास्तव अत्यंत नैसर्गिकपणे मांडले आहे. मुलांच्या शालेय जीवनातील बदल, घरातील तणाव, पालकांचे चिंता, आणि समाजातील बंधने यांचा कथेत थेट अनुभव दिसतो. या कथेतून लेखकाने समकालीन जीवनातील अडचणी आणि तणाव यांचा सूक्ष्म निरीक्षण मांडले आहे. वाचक स्वतःच्या जीवनाशी कथा सहज जोडतो, आणि त्यातून सामाजिक आणि मानवी अनुभवाची गहिरेपणा जाणवतो.
लेखकाने वापरलेली भाषा अत्यंत संवेदनशील आहे. साध्या मराठी शब्दांतून भावनांचे गहन थर उलगडले आहेत. वाक्यांची लय, शब्दांची निवड, विरामचिन्हांचा वापर, संवादातील नैसर्गिकता – हे सर्व घटक कथेला प्रभावी बनवतात. दृश्यात्मक वर्णनाची क्षमता प्रगल्भ आहे; घराचे कोपरे, अंगणातील सावल्या, संध्याकाळची शांती, मुलांचे लपलेले विचार – या दृश्यांमधून पात्रांच्या मानसिकतेची झलक मिळते. संवाद नैसर्गिक आहेत आणि कथेत गती निर्माण करतात. काही ठिकाणी साहित्यिक अलंकार, सूक्ष्म उपमा, आणि प्रतिमा वापरल्या आहेत, ज्यामुळे कथा अधिक गहिरेपणा देतात.
संग्रहातील पात्रे साधी, सामान्य, परंतु जिवंत आहेत. मुलांच्या स्थिती, पालकांची चिंता, शिक्षकांचे बंधन, समाजाचे नियम – हे सर्व पात्रांच्या माध्यमातून स्पष्ट होतात. लेखकाची मोठी ताकद म्हणजे पात्रांच्या अंतरंगातून अनुभव उलगडणे. काही पात्र प्रत्यक्ष बोलत नाहीत, तरी त्यांच्या अस्तित्वामुळे कथा प्रभावी ठरते. प्रत्येक पात्राची भावना सूक्ष्मदृष्टीने मांडलेली आहे, आणि वाचक त्या अनुभवाला स्वतःच्या मनात स्थान देतो.
संग्रहातील कथा सामाजिक वास्तवाशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत. मुलांच्या शालेय अडचणी, पालकांच्या अपेक्षा, कौटुंबिक ताण, समाजाचे नियम – या सर्व गोष्टी कथेत प्रभावीपणे दिसतात. कथेतून लेखकाने व्यक्तीच्या आंतरिक संघर्षाला सामाजिक संदर्भातून बाहेर आणले आहे. वाचकाला पात्रांचा अनुभव केवळ निरीक्षणातून नव्हे, तर भावनिक सहभागी होऊन जाणवतो. ‘लॉकडाऊन’ ही कथा फक्त महामारीकाळातील अनुभव सांगत नाही; ती घरातील तणाव, पालक‑मुलांमधील संवाद, आणि सामाजिक प्रतिबंध यांचा थेट अनुभव देऊन वाचकास समकालीन जीवनातील अनुभवाची जाणीव करून देते.
लेखकाने भावनांचा गहिरेपणा अत्यंत प्रभावीपणे उलगडला आहे. अनेक प्रसंगांत वाचकास सूक्ष्म भावनांचा अनुभव होतो – आनंद, निराशा, आशा, भिती, अपेक्षा, ताण आणि अंतर्मुखता. कथांचा अंत अचानक किंवा मोठ्या क्लायमॅक्सशिवाय येतो; त्यामुळे वाचक स्वतःच्या मनात पात्रांचा अनुभव आत्मसात करतो. जीवनातील साध्या प्रसंगांमध्येही ‘जादू’ आहे असे लेखक दर्शवतो. एखाद्या आईच्या हसण्यात, मुलाच्या छोट्या यशात, घराच्या कोपऱ्यातील शांततेत ही जादू जाणवते. शीर्षक ‘जादुची पिशवी’ अत्यंत योग्य ठरते; पिशवी प्रतीकात्मक आहे – जिथे जीवनातील साध्या प्रसंगांमध्ये दडलेली भावना, अनुभव आणि क्षणिक आनंद‑दुःख एकत्रित आहेत.
संग्रहातील बलस्थान म्हणजे साध्या जीवनातील गहिरे अनुभव, संवाद, दृश्यात्मकता, सामाजिक व व्यक्तिमत्त्वात्मक संदर्भ, आणि भावनांचा थर. लेखकाने साध्या प्रसंगातून मानवी मनाची गहनता उलगडली आहे. संवाद नैसर्गिक आहेत, दृश्यात्मक वर्णन प्रभावी आहे, आणि सामाजिक संदर्भ कथेला वास्तविकतेची जाणीव देतो. कथांचे भावनात्मक थर वाचकाला ओझरती‑थरथर अनुभव देतात, आणि प्रत्येक प्रसंग वाचकाच्या मनात दीर्घकाळ टिकतो.
संग्रह वाचताना एक ठराविक मनःस्थितीचा प्रवास अनुभवता येतो. वाचक पहिल्या प्रसंगात पात्रांच्या जीवनात सामील होतो, त्यांच्या अनुभवांमध्ये साम्य शोधतो, आणि नंतर कथांच्या पुढील थरांतून अधिक खोलवर जातो. प्रत्येक कथा, जरी संक्षिप्त असली, तरी तिचा प्रभाव दीर्घकाळ मनावर राहतो. या दृष्टिकोनातून, ‘जादुची पिशवी’ वाचकास साध्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांची जाणीव, सामाजिक वास्तवाचा अनुभव, आणि मानवी भावना समजण्याची क्षमता देते.
लेखनाची शैली अत्यंत नाजूक पण प्रभावी आहे. वाक्यांची लय, शब्दांची निवड, विरामचिन्हांचा ताळमेळ – हे सर्व कथेला जिवंतपणा देतात. दृश्यात्मक वर्णन पात्रांच्या अंतर्मनाची झलक उघडते. घरातील संध्याकाळची शांती, मुलांचे लपून बसणे, आईची चिंता – या दृश्यांचा प्रभाव वाचकाच्या मनावर थेट पडतो. काही प्रसंगांत उपमा, प्रतिमा आणि सूक्ष्म अलंकारांचा उपयोग कथेला अधिक रसाळपणा आणि गहिरेपणा देतो.
वाचकाला हा संग्रह केवळ वाचनाचा आनंद देत नाही, तर साहित्याचा अनुभव, सामाजिक जाणीव, आणि भावनात्मक संवेदनशीलता देखील विकसित करतो. लेखकाने पात्रांच्या अंतर्मनाला महत्त्व दिले आहे, समाजातील परिस्थितीला कथेत मिसळले आहे, आणि रोजच्या जीवनातील साध्या प्रसंगातून मोठे अर्थ निर्माण केले आहेत. वाचक प्रत्येक कथेत स्वतःला शोधतो, आणि त्या अनुभवातून आपले अंतर्मन समृद्ध होते.
संग्रह वाचल्यावर वाचकास समजते की साध्या घटनांमध्येही जीवनाची जादू आहे – प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभव, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. लेखकाने ही जादू लहान लहान प्रसंगांमधून वाचकास अनुभवायला दिली आहे. कथा केवळ मनोरंजक नाहीत; त्या विचार करायला, अंतर्मुख होायला आणि जीवनाच्या सूक्ष्म बाजूंवर लक्ष देायला प्रवृत्त करतात.
एकूणच, नासा येवतीकर यांचे ‘जादुची पिशवी’ हे कथासंग्रह मराठी लघुकथालेखनातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. वाचकाला भावनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध अनुभव देणारे, साध्या प्रसंगांमधील गहिरे अर्थ उलगडणारे, आणि मानवी जीवनातील सूक्ष्म जादूचा अनुभव देणारे साहित्यिक काम आहे. संग्रहाच्या प्रत्येक कथेत मानवी अंतर्मनाची जाणीव, सामाजिक संदर्भ, आणि दृश्यात्मक अनुभवांचा तळागाळ आहे. वाचक प्रत्येक प्रसंगातून स्वतःच्या अनुभवाशी तुलना करतो, जीवनातील सूक्ष्म क्षणांचा अर्थ शोधतो, आणि कथांच्या प्रभावातून अधिक संवेदनशील, अधिक जागरूक बनतो.
‘जादुची पिशवी’ वाचल्यावर वाचकाला ही जाणवते की, सोप्या शब्दांतही जीवनाचा गहिरे अर्थ, मानवी भावनांचा अनुभव, आणि समाजातील सूक्ष्म अंतरदृष्टी प्रभावीपणे व्यक्त केली जाऊ शकते. प्रत्येक कथा वाचकाला भावनात्मक प्रवास देऊन अंतर्मन समृद्ध करते. हा संग्रह केवळ वाचनासाठी नाही, तर विचार करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी, आणि जीवनातील सूक्ष्म जादू समजण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सदरील कथासंग्रह ई साहित्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे. तेव्हा आपण ही या पुस्तकाचा आनंद घ्यावे.


सौ अंजली देशमुख घंटेवार
ग्रामगीताचार्य नागपूर
8669664633

Tuesday, 4 November 2025

जागर जाणिवांचा पुस्तक परिचय ( Book )

तनामनात ज्योत पेटविणारा " जागर जाणिवांचा "
~~~~~~~~~~~~~~~~
चौकट - मा. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि अक्षर प्रकाशन आजराचे प्रकाशक सुभाष विभुते यांच्या हस्ते विनायक हिरवे लिखित जागर जाणिवांचा या पुस्तकाचे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन मध्ये दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेला थोडक्यात आढावा. 
~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षक म्हणजे केवळ शाळेतील ज्ञान देणारे नसून ते समाजाला संवेदना, संस्कार आणि दृष्टी देणारे मार्गदर्शक आहेत. संवेदनशील नागरिक घडविण्याचे खूप मोठे काम शिक्षक करत असतात. पूर्वीचा काळ असो की आजचा काळ, शिक्षकांना नेहमीच समाजात मान सन्मान मिळतो. फक्त समाजाला समजून घेऊन कार्य करता आले पाहिजे. शिक्षक हा समाज घडविणारा खूप मोठा अभियंता आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकांमध्ये निर्माण व्हावा या उदात्त हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक विनायक हिरवे यांनी जागर जाणीवांचा हे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे निमित्त साधून आजरा येथील अक्षर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक नसून एक शिक्षक आपली शिक्षकी पेशा सांभाळत सामाजिक कार्य कसे पूर्ण करता येऊ शकते ? समाजाचे ऋण कसे फेडता येईल ? याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हे पुस्तक लेखकाचे आत्मकथन आहे पण त्यांच्या आत्मकथनातुन प्रेरणा घेण्यासारखं आणि नवीन काही शिकण्यासारखं व करण्यासारखं खूप आहे. शालेय जीवनातील अनेक प्रसंग आणि घटना आपले पुढील आयुष्य घडवत असतात. शाळेमध्ये शिक्षणासोबत इतर क्रिया देखील अत्यंत महत्वाचे असतात. शाळेतील शिक्षक तर विद्यार्थ्यांवर संस्कार टाकण्याचे काम करतातंच शिवाय सहकारी विद्यार्थी मित्र देखील संस्कार करत असतात. पुस्तक वाचताना या गोष्टीची प्रत्येक वेळी जाणीव होत असते. गरिबी माणसाला संघर्ष करायला शिकविते. संकटे ही माणसाला स्वतःच्या सामर्थ्यांची कल्पना देतात. तावून सुलाखून कणखर बनवून बाहेर काढतात. लेखकांची ही स्वमत वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नशीब देखील चांगले असावे लागते. नशिबात काय लिहून ठेवलं आहे ? हे विधात्याशिवाय कोणालाच माहित नाही. लेखकांना खरं तर नाविक दलात काम करण्याची इच्छा होती मात्र अपघाताने ते शिक्षक झाले. म्हणून त्यांनी नाराज किंवा निरूत्साही झाले नाहीत. त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करत सोने निर्माण केले आहे. आपला स्वभाव प्रेमळ आणि मायाळू असेल तर शत्रू देखील आपला मित्र बनतो. कुणापुढे हात पसरण्याची देखील गरज नसते आणि भरपूर मदत मिळू शकते पण त्यासाठी अगोदर स्वतःला खूप कष्ट आणि दुःख सोसावे लागते. लेखकाला जीवनात अनेक चांगल्या लोकांशी संपर्क आला. ज्यात प्रामुख्याने सेवायोग संस्थेचे इंद्रजित देशमुख आणि साद माणुसकीचे संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले त्यांच्या सहवासाने लेखकांच्या जीवनात आमूलग्र बदल झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. समाजातील तळागाळातील गरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ नावाची ज्योत त्यांनी चोवीस वर्षांपूर्वी पेटविली. ज्ञान, प्रबोधन आणि सेवा या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन, या अंतर्गत त्यांनी अनाथ लोकांना मदत, पूरग्रस्ताना मदत, विधवा महिलासाठी हळदी कुंकू, सायकल बँक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब मुलांसाठी असलेली अभ्यासिका असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्या सर्व उपक्रमाची माहिती वाचताना अंगावर शहारे येतात. मित्र परिवाराची मिळालेली साथ हे ही अत्यंत महत्वाचे आहे. राज्यपुरस्कार मिळणे हे कोणत्याही शिक्षकांसाठी खूप मोठे पारितोषिक आहे. पण लेखकांनी हा पुरस्कार का मिळविले ? याची कहाणी खूपच रोचक आहे. शैक्षणिक व्यासपीठाची स्थापना आणि त्या अंतर्गत केलेले सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे. लेखक आपल्या पहिल्या पानावर नेल्सन मंडेला यांचे वाक्य लिहिले आहे, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता. खरंच आहे, शिक्षणाने जी क्रांती होते, ती अन्य कशानेही होत नाही. म्हणून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण मिळायला हवे. यासाठी प्रत्येक शिक्षकांने धडपड करायला हवे. हीच प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक आहे, असे मला वाटते. शिक्षक व लेखक विनायक हिरवे यांचे कार्य समजून घेण्यासाठी आणि आपण ही समाजासाठी काही करू शकतो हे जाणून घेण्यासाठी जागर जाणीवांचा पुस्तक वाचायलाच हवं. इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी यांची सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. पुस्तकाची सुंदर व आकर्षक अशी बांधणी असून अक्षर जुळणी छान केलेली आहे. रुपेश वारंगे यांचे मुखपृष्ठ वाचकांचे मन वेधून घेते. या पुस्तकात एकूण 199 पृष्ठ असून पुस्तकाची किंमत 250 ₹ आहे. लेखकांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा ......!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद, 9423625769

Sunday, 5 October 2025

कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri )

कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व -

पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत. पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे. मात्र, लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे, तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती. हे पाहून ती खूप दुःखी झाली. एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, 'तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात. मात्र, जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलीस, तर तुला संततीसुख लाभेल'. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार, सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर, तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे, ती निराश झाली. पण, बाळाला एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली, तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी सावकाराच्या लहान मुलीच्या मृत मुलाला लागला आणि अचानक रडू लागला. हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की, 'जर मी या पाटावर बसले असते, तर हा मुलगा मेला असता ना?' तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली, 'हा मुलगा पूर्वीच मृत होता. मात्र, तुझ्या चांगल्या कर्मांमूळेच माझा मुलगा जिवंत झाला'. तेव्हापासून, अशी प्रथा सुरू झाली की, जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करेल, त्याला चांगले फळ मिळेल.

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात ?
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात. ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांना दैवी गुणांनी युक्त मानले जाते. इतकंच नाही, तर मसाला दुधातील औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असते आणि पित्तदोष कमी करण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

संकलन - नासा येवतीकर 

सवय (Habit)

  सवय जीवन घडवणारा अदृश्य घटक मानवाचे आयुष्य आकार घेते ते त्याच्या विचारांमधून आणि कृतीमधून; आणि या दोन्हींच्या मागे असतो तो एक ...